कृतिशील समाजसेवक -पंढरीनाथ पाटील
कृतिशील समाजसेवक - शिक्षणमहर्षी पंढरीनाथ पाटील
----------------------------------------------------------------------
विदर्भात अनेक रत्ने जन्माला जन्म आलीत. दलितमित्र समाजभूषण पंढरीनाथ पाटील हे त्यापैकी एक होत. पंढरीनाथ पाटील यांचा जन्म २० सप्टेंबर १९०३ रोजी खामगाव तालुक्यातील अंबोडा या लहानशा खेड्यात झाला. सिताराम पाटील आणि आई राधाबाई या वारकरी संप्रदायाच्या विचारसरणीत पंढरीनाथ पाटलांचे बालपण गेले. विसाव्या शतकात सर्वप्रथम समाजसुधारणेची मुहूर्तमेढ रोवणारे ते एक कुटुंब होते. पंढरीनाथ पाटील यांचे आजोबा गंभीरजी पाटील हे खर्चिक आणि उदार स्वभावाचे आणि कट्टर पुरोगामी विचारसरणीचे होते. ग्रामीण लोकं अनिष्ट रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा यात जखडून गेली होती.
ब्रिटिश राजवटीत अज्ञान, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव, कर्मकांड ,उच्चवर्णीयांची मक्तेदारी् यांचे विरुद्ध संघर्ष करणे सापे नव्हते. विसाव्या शतकात सामाजिक बंड करून समाजसुधारणेची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न पंढरीनाथ पाटीलांनी केला. ' कमवा आणि शिका ' या भाऊराव पाटलांच्या घोषणेप्रमाणे पंढरीनाथ पाटलांनी सातपुडा पर्वतात जाऊन पळसांची पाने आणलीत. द्रोण व पत्रावळ्या स्वतः तयार केल्या.त्या गावोगावी जाऊन विकल्या. एवढ्यावर भागले नाही म्हणून त्यांनी स्टेशनमास्तरची पेपरची रद्दी विकत घेऊन ती गावोगावी दुकानदारांना विकली. आलेल्या कमाईतून काटकसरीने आपल्या शिक्षणाचा खर्च भागविला. त्यांनी पिंपळगाव काळे येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. जर शाळांना वसतिगृह असती तर गोरगरीब विद्यार्थ्यांची राहण्याची आणि शिक्षणाची सोय झाली असती,अशी कल्पना त्यांच्या मनात तेव्हा चमकून गेली होती.
शालेय शिक्षण घेत असताना मोतीराम तुकाराम वानखेडे यांचे 'ब्राह्म आणि बहिष्कार', दयानंद सरस्वती यांचे सत्यार्थप्रकाश आणि कबीरांची बीजक अशी पुस्तके त्यांच्या वाचनात आली. या ग्रंथवाचनाने त्यांच्या मनात महात्मा फुल्यांची सत्यशोधकी विचारधारा आणि सामाजिक समता हे विचार रूजले. यातूनच त्यांची सत्यशोधक चळवळ बाळसं धरू लागली. एकदा पुराणिकांने त्यांना ' तू शूद्र आहेस ? 'असे म्हटले होते , हा शब्द त्यांच्या जिव्हारी लागला. दुसऱ्याला कमी लेखण्याचा हा प्रकार होता. तो त्यांना आवडला नाही. यातील सत्य शोधल्याशिवाय त्यांना चैन पडले नव्हते.
१९२१ ला त्यांच्या जीवनात एक ऐतिहासिक घटना घडली. महंमद अली आणि शौकत अली हे दोघे बंधू खिलाफतच्या आणि राष्ट्रीय सभेच्या प्रचारासाठी मलकापूरला आले होते. त्यांची भाषणे ऐकून पंढरीनाथ पाटील प्रभावित झाले. ब्रिटिश सरकारच्या न्यायालयावर व शाळा कॉलेजवर बहिष्कार टाकणे हे त्यांच्या भाषणांची वैशिष्ट्ये होती.एकंदरीत ब्रिटिशांना 'चले जाव' असे वातावरण तयार झाले होते. स्वदेशी शाळा स्थापन करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व वसतिगृहांची सोय जनतेने करावी असे विचार अली बंधूंनी त्यावेळी मांडले होते. या भाषणांनी पंढरीनाथ पाटील इतके प्रभावित झाले की त्यांनी शाळा सोडून दिली आणि राष्ट्रीय चळवळीत सहभाग घेतला. पंढरीनाथ पाटील केवळ सतरा वर्षांचे असताना त्यांनी परकीय सत्तेविरुद्ध बंड पुकारून एक प्रकारे बंडाची तुतारी फुंकली होती. विद्यार्थीदशेतील वैचारिक ग्रंथांचे वाचन , खेड्यापाड्यातील अनिष्ट रूढी परंपरा पाहून आलेला वाईट अनुभव, वडिलांकडून मिळालेला समाजकार्याचा वारसा, शिक्षण घेत असताना झालेले हाल आणि प्रभावी व्यक्तींच्या भाषणाचा मनावर पडलेला प्रभाव इत्यादि बाबी पंढरीनाथ पाटलांना कृतिशील समाज सुधारक बनण्यासाठी कारणीभूत ठरल्यात.
पंढरीनाथ पाटलांनी समाजसुधारणेची पहिली मुहूर्तमेढ मलकापूर जवळ असलेल्या जांभूळ धाबा येथे रोविली. ब्रिटिश सरकारला विरोध म्हणून सर्वप्रथम ब्रिटिश न्यायालयावर बहिष्कार घातला. त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून ' न्याय पंचायत ' स्थापन केली. वाचनाने राष्ट्रीय चळवळ वृध्दिंगत होईल हे गृहीत धरून वाचनासाठी गावोगावी सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली. ब्रिटिश सरकारला हे सहन झाले नाही. त्यांनी पोलीस पाठवून पंढरीनाथ पाटलांना दम दिला आणि न्यायपंचायत आणि सार्वजनिक वाचनालय बंद करण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश सरकारच्या या कृतीने उलट पंढरीनाथ पाटील राखेतील फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उठले आणि उंच भरारी घेतली. त्यांना जनतेची साथ मिळाली. जनतेला पंढरीनाथ पाटील आता चांगले कळू लागले. नव्या जोमाने ते कामाला लागले. ब्रिटिशांची कुटील आणि धूर्त नीति जनतेलाही समजली.
पुणे येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची कोनशीला ब्रिटनचे युवराज प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते बसविण्यात येणार होती. या कार्यक्रमाचे रितसर निमंत्रण पंढरीनाथ पाटलांना मिळाले. नामवंतांच्या पंक्तीत बसण्याचा त्यांना मान मिळाला होता. कोल्हापूरचे शाहू महाराज या कार्यक्रमाचे प्रमुख व्यवस्थापक होते. या निमंत्रणावरून त्यांची महती लक्षात येते.
आणखी एक अभूतपूर्व घटना त्यांच्या जीवनात घडली. मुंबई येथे ' मुंबई इलाखा पाटील परिषदेचे ' एक अधिवेशन श्रीमंत माधवराव शिंदे यांचे अध्यक्षतेखाली होते. त्यासाठी विविध गावातील पाटील आणि सत्यशोधक समाजाची जलसेही हजर राहणार होते. या कार्यक्रमासाठी पंढरीनाथ पाटील आवर्जून उपस्थित होते.'जागरूक' चे संपादक वालचंद कोठारी, 'विजयी मराठा' चे संपादक श्रीपतराव शिंदे शिवाय बाबुराव जेधे, विठ्ठल रामजी शिंदे, भास्करराव जाधव अशी प्रतिष्ठित मंडळी देखील उपस्थित होती. या कार्यक्रमातून पंढरीनाथ पाटलांना समाजप्रबोधनाची प्रेरणा आणि दिशा मिळाली.
विशेष बाब म्हणजे समाजात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात बहुजन समाजाला अधिकार आणि मानाचे स्थान मिळावे अशा प्रकारचे विविध ठराव या सभेत पारीत करण्यात आले. तसेच प्रत्येकाने केवळ बोलके सुधारक न बनता कर्ते सुधारक बनावे असेही आवाहन करण्यात आले.
महात्मा फुल्यांचे आद्य चरित्रकार, बहुजनांचे कैवारी , समाजभूषण, दलितमित्र, माजी खासदार पंढरीनाथ पाटील, हे विशेष करून विदर्भाच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांनी सत्यशोधक समाज, ब्राह्मणेतर समाज, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शाळा-महाविद्यालय व वसतिगृहे या सर्व कामी स्वतःचे आयुष्य चंदनाप्रमाणे झिजविले. ते अनेक वर्षे खासदार होते. राज्य कायदेमंडळात सभासद म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले. राज्यसभेतील त्यांची भाषणे फारच गाजली होती.
१९५२ मध्ये चिखली येथे श्री शिवाजी डी.एड.कॉलेज, श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय आणि श्री शिवाजी अभ्यास शाळा स्थापन करून शिक्षणाची दारे सर्व जाती धर्मियांसाठी खुली करून दिली. तसेच मुला-मुलींसाठी राहण्याची व जेवणाची सोय व्हावी म्हणून श्री शिवाजी वसतिगृहाची स्थापना केली. शिवाय १९६७ ला श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय स्थापन करून उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण करून दिली. तसेच ग्रामीण भागातील मुलांना शिकता यावे म्हणून देऊळगाव मही, मेरा बु., किन्होळा, मासरूळ, चांडोळ, हातेडी व आणि इसोली या ठिकाणी शिक्षणाची संधी निर्माण करुन दिली.
तत्कालीन परिस्थितीत शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,कर्मयोगी संत गाडगेबाबा, यशवंतराव चव्हाण आणि रा.दे. उपाख्य भोंडे सरकार यांचे सोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांचा चिखली येथे हिरक महोत्सव यशवंतराव चव्हाण यांचे उपस्थितीत १९६८ मध्ये पार पडला.एक लाख रुपयांचा मिळालेला निधी त्यांनी श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयाच्या उभारणीसाठी दिला. याला म्हणतात दानत्ववृत्ती आणि शिक्षणाविषयी असलेले प्रेम.
महात्मा फुल्यांचे आद्य चरित्रकार, बुलढाणा जिल्ह्यातील सत्यशोधक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, बुद्धीप्रामाण्यवादी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात तळमळीने काम करणारे लोकनेते, दलितमित्र शिक्षणमहर्षी पंढरीनाथ पाटील हे खऱ्या अर्थाने कर्मयोगी, शिक्षणमहर्षी आणि कृतिशील समाजसेवक होते.
* प्रा. दिगंबर कानडजे, सागवन-बुलढाणा
भ्रमणध्वनी - ८२७५२३१८७४